जीवनात "प्रमाणाला" अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट प्रमाणशीर असावी. प्रमाणबद्ध असावी. प्रमाणात असावी. या परंपरागत धारणेला सुंदर शब्द दिले आहेत कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी.
अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।
अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।
अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।
अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।
अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।
अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।
अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।
अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।
अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।
अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।
अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।
अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती शोक तो देतसे दु:खवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१६ ।।
अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।
अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।
जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१९ ।।
सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।
रामदासस्वामींप्रमाणेच या कवितेत "भुजंगप्रयात" वृत्ताचा दैदिप्यमान वापर केलेला दिसून येईल. यातील तत्त्वसार सदा संजीवित आढळून येईल.
आरोग्य आणि स्वस्थता, ह्या गुणवत्तापूर्ण नागरी जीवनाच्या किमान आवश्यकता आहेत. आजच्या गतीमान आयुष्यात, आरोग्य आणि स्वस्थता यांबाबत पुरेसे प्रशिक्षण सहजी उपलब्ध नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य आणि स्वस्थता यांचा समर्थ सांभाळ करता यावा याकरता आवश्यक त्या सर्व अद्ययावत माहितीचे संदर्भसाधन, मराठीतून निर्माण करणे, हा या अनुदिनीचा उद्देश आहे.
प्रार्थना
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम् ॥
न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।
नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्या आजला.
I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.
न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।
नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्या आजला.
I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.
२ टिप्पण्या:
श्री गोळे: तुकारामांना शोभेल अशी 'आधी बीज एकले' ही रचना शांताराम आठवल्यांनी जशी केली, तशी ही रामदासांना शोभेल अशी कृष्णाजी नारायण आठल्ये यांची रचना आहे. ती आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद. कवींविषयी आणखी काही माहिती मिळू शकेल काय?
माझ्या अनुदिनीस भेट दिल्याखातर हार्दिक धन्यवाद!
मला स्वतःला कवींविषयी फारशी माहिती नाही. पण त्यांची कविता हीच त्यांची उत्तम ओळख आहे असे मला वाटते. ही कविता "आठवणीतल्या कवितां"मधेही प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे त्या पुस्तकात कदाचित आणखीही माहिती सापडू शकेल. कळल्यास मलाही सांगा.
टिप्पणी पोस्ट करा